वाशिम दि.२२ (जिमाका) सुकन्या समृद्धी योजनेचा सातवा वर्धापन दिन भारतीय डाक विभाग येत्या २४ जानेवारीला साजरा करीत आहे.पोस्ट विभाग मुलींचे भविष्य उज्वल व सक्षम करण्याची संधी देत आहे. सुकन्या समृद्धी योजना ही भारत सरकारची एक छोटी ठेव योजना आहे. जी केवळ मुलींसाठी आहे. "बेटी बचाव बेटी पढाओ" चा तो एक भाग म्हणून सुरू करण्यात आली आहे. मुलीच्या उच्च शिक्षणासाठी व तिच्या विवाहासाठी तसेच महिला सक्षमीकरण करणे या उद्देशाने भारत सरकारने ही योजना सुरू केली आहे. मुलीच्या उज्वल भविष्यासाठी राष्ट्रीय बालिका दिनाचे औचित्य साधून १० वर्षाखालील मुलींचे उज्वल भविष्य साधण्यासाठी सुकन्या खाते काढल्यापासून १५ वर्षे दरमहा रक्कम भरल्यास २१ व्या वर्षी ७.६ टक्के प्रमाणे रक्कम मिळणार आहे. दरमहा बचत १ हजार रुपये केल्यास एका वर्षात १२ हजार रुपये रक्कम जमा होईल.१५ वर्षात ही रक्कम १ लाख ८० हजार रुपये जमा होईल.मुलीच्या २१ व्या वर्षात ३ लाख ३० हजार ३७३ रुपये जमा होईल. २१ व्या वर्षात चालू व्याजावर मिळणारी एकूण रक्कम ५ लाख १० हजार ३७३ एवढी असणार आहे. सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत ० ते १० वर्षाच्या आतील मुलींना या योजनेचा लाभ घेता येईल. सुकन्या खाते किमान २५० रुपयांमध्ये उघडता येते. हे खाते काढल्यापासून १५ वर्ष पैसे भरावे लागतात. सुकन्या समृद्धी हे खाते उघडल्यापासून २१ व्या वर्षापर्यंत खात्याची मुदत आहे. मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यावर, मुलीचे लग्न झाल्यास एस.एस.वाय खाते मुदतपूर्व बंद करता येते.सुकन्या खात्यामध्ये कमीत कमी वार्षिक २५० रुपये व जास्तीत जास्त १ लाख ५० हजार रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते. खाते काढण्यासाठी ग्रामपंचायत/ नगरपंचायत/ नगरपालिका/महानगर पालिका यांनी जारी केलेले मुलीचे जन्म प्रमाणपत्र आवश्यक आहे. तरी या योजनेचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त मुलींच्या पालकांनी लाभ घ्यावा.असे आवाहन वाशिम डाक विभागचे उपविभागीय अधिकारी श्री. हिवराळे यांनी केले आहे.
मुलींना बचतीसाठी सुकन्या समृद्धी योजना
देशातील गरीब मुलींच्या शिक्षणासाठी आणि संबंधित मुलगी सज्ञान झाल्यानंतर तिच्या लग्नासाठी हक्काचे पैसै मिळावेत, या उद्देशाने केंद्र सरकारने २०१५ पासून ही योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत भारतातील कोणत्याही टपाल कार्यालयात (पोस्ट आॅफीस) मुलीच्या नावे खाते उघडावे लागते. या खात्यावर दरमहा किमान १०० रुपयांपासून रक्कम जमा करता येते. यानुसार या खात्यावर प्रत्येक वर्षी कमीत कमी एक हजार रुपये तर जास्तीत जास्त दीड लाख रुपये जमा करता येतात. या जमा रकमेवर प्रचलित व्याज दरानुसार व्याज देण्यात येते. याचा लाभ घेण्यासाठी मुलीचे वय कमाल दहा वर्ष किंवा त्याच्या आत असणे आवश्यक आहे. खाते उघडल्यानंतर १४ वर्षे दरमहा निश्र्चित केलेली बचतीची रक्कम खात्यावर जमा करणे अनिवार्य आहे.
एका कुटुंबातील जास्तीत जास्त दोन मुलींनाच या योजनेचा लाभ घेता येतो. तीन वर्ष बचत केल्यानंतर या जमा रकमेवर नियमानुसार कर्ज मिळू शकते. मुलीचे वय १८ वर्ष झाल्यानंतर हे खाते बंद करता येते. तोपर्यंत खात्यावर जमा झालेली रक्कम व्याजासह मुलीच्या पालकाला देण्यात येते. याच जमा रकमेतून मुलीच्या लग्नासाठी खर्च करता येऊ शकेल, ही या योजनेच्या अंमलबजावणीमागची केंद्र सरकारची भावना आहे. पोस्ट आॅफीस व्यतिरिक्त देशातील विविध २८ बँकांमध्येही ही योजना सुरू करण्यात आली आहे.
- योजना पात्रता निकष :-
- मुलीचे वय दहा वर्षांच्या आत असावे.
- एका कुटुंबातील जास्तीत जास्त दोन मुलींना लाभ घेता येतो.
- जुळ्या मुली असतील तर, संबंधित दोन आणि अन्य एका मुलीचे खाते उघडता येते.
- दरवर्षी किमान एक हजार आणि कमाल दीड लाख रुपये बचतीचीची मुभा.
- पोस्ट आॅफीसमध्ये किंवा निश्र्चित केलेल्या बँकेत खाते उघडणे अनिवार्य.
- निश्र्चित तारखेला दरमहा बचत जमा करणे बंधनकारक.
- आवश्यक कागदपत्रे :-
- विहित नमुन्यातील अर्ज.
- मुलींच्या जन्म तारखेचा पुरावा.
- जुळ्या मुली असल्यास, त्याबाबतचा सक्षम पुरावा.
- रहिवासी प्रमाणपत्र.
- ओळखीबाबातचा पुरावा.
- अर्ज कोठे कराल?
याबाबतचा विहित नमुन्यातील अर्ज बचत खाते उघडण्यासाठी करावा लागतो. हे बचत खाते जवळच्या पोस्ट आॅफीसमध्ये किंवा निश्र्चित करुन दिलेल्या २८ बँकापैकी कोणत्याही एका बँकेत उघडता येते.