Ticker

6/recent/ticker-posts

महाराष्ट्राच्या प्रज्ञास्थळावरील हा हल्ला खपवून घेतल्या जाणार नाही - डॉ. माधव हिवाळे : ‘राजगृह’ तोडफोड घटनेचा भिमसंग्राम सामाजीक संघटनेने केला तीव्र निषेध


वाशीम - महामानव, भारतरत्न, घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मुंबई येथील निवासस्थान हे समस्त महाराष्ट्रातील जनतेचे प्रज्ञास्थळ व उर्जा केंद्र आहे. या उर्जाकेंद्रावर मंगळवारी विघातक प्रवृत्तीकडून झालेला हल्ला अतिशय निंदनिय असून या प्रज्ञास्थळावरील हल्ला कदापीही खपवून घेतला जाणार नाही. सरकारने या घटनेतील समाजकंटकांना त्वरीत पकडून त्यांना कठोर शासन करावे अन्यथा महाराष्ट्रात जनप्रक्षोभ उसळल्याशिवाय राहणार नाही अशी मागणी भिमसंग्राम सामाजीक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. माधव हिवाळे यांनी केली आहे. ‘राजगृह’ तोडफोड घटनेचा संघटनेच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला असून यासंदर्भात ८ जुलै रोजी मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले.
    निवेदनात नमूद आहे की, दादर (मुंबई) हिंदु कॉलनी येथील महामानव डॉ. बाबासाहेब अांबेडकर यांच्या ‘राजगृह’ या निवासस्थानावर मंगळवार, ७ जुलै रोजी सायंकाळी अज्ञात समाजकंटकांनी प्रवेश करुन तेथील सामानाची नासधुस व तोडफोड केली. यासोबतच तेथील सीसीटीव्ही कॅमेरेही फोडण्यात आले. या निंदनीय घटनेचा भिमसंग्राम सामाजीक संघटनेच्या वतीने तीव्र निषेध करण्यात येत आहे. महाराष्ट्राच्या प्रज्ञास्थळावरील हा हल्ला खपवून घेतल्या जाणार नाही. या प्रकरणातील समाजकंटकांवर कारवाई झालीच पाहीजे. अन्यथा महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात जनप्रक्षोभ वाढेल. ’राजगृहाच्या आवारात घुसून काही गुंडांनी धुडगूस घातला ही घटना धक्कादायक आहे. ही वास्तू फक्त आंबेडकरी जनतेची नाही तर संपूर्ण समजाचे श्रद्धास्थान आहे. आपला ग्रंथ खजिना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या वास्तूत जपून ठेवला. महाराष्ट्रातील तमाम जनतेचे हे तीर्थक्षेत्रच आहे. राजगृह हे देशातील तमाम जनतेसाठी एक महत्त्वाचं ऊर्जा केंद्र आहे. या निवासस्थानाची केलेली तोडफोड ही अत्यंत निंदनीय आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार हे देशातील प्रत्येक नागरिकाच्या मनात खोलवर रुजलेले आहेत. कोणतीही विघातक मनोवृत्ती हे विचार कदापि संपवू शकत नाही. असा भ्याड हल्ला करणार्‍यांना सरकारने शोधून काढून त्यांना कठोरात कठोर शासन करण्यात यावे. अन्यथा भिमसंग्राम सामाजीक संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलनाचा पवित्रा घेण्यात येईल असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.