Ticker

6/recent/ticker-posts

करोना इफेक्ट : शाळांच्या शुल्कवाढीला ब्रेक : लॉकडाऊन काळात मागील शुल्क भरणा लांबवा : पर्याय उपलब्धीचे निर्देश : पालकांना दिलासा : वर्ष २०२०-२१ वर्षात शुल्क कमी करण्याच्या सुचना


करोना इफेक्ट : शाळांच्या शुल्कवाढीला ब्रेक : लॉकडाऊन काळात मागील शुल्क भरणा लांबवा : पर्याय उपलब्धीचे निर्देश : पालकांना दिलासा : वर्ष २०२०-२१ वर्षात शुल्क कमी करण्याच्या सुचना
वाशीम - करोना महामारी रोखण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र गत २४ मार्चपासून लॉकडाऊन करण्यात आला आहे. या लॉकडाऊनचे दुरगामी परिणाम विविध क्षेत्रासह शिक्षण क्षेत्रावरही पडले आहेत. विद्यार्थ्याच्या वार्षिक परिक्षा रद्द करुन परिक्षेविनाच वर्गोन्नती करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत लॉकडाऊनमुळे सवर्र् सरकारी व खाजगी क्षेत्र प्रभावित झाले असल्यामुळे सरकारने विविध हिताचे निर्णय घेवून या क्षेत्रातील संबंधीत घटकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. याबरोबरच शैक्षणिक क्षेत्राला व पर्यायाने विद्यार्थ्यांच्या पालकांना दिलासा देणारा निर्णय शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने ८ मे रोजी निर्गमित केला असून या निर्णयानुसार लॉकडाऊन काळात सर्व बोर्डाच्या शाळा व्यवस्थापनाला मागील वर्षाचे शाळा शुल्क भरणा करण्याबाबत सक्ती करता येणार नाही. तसेच सदरचे शुल्क पालकांकडून एकदाच न घेता मासिक, तिमाही, सहामाही अशा टप्प्यात घेण्याबाबत पर्याय उपलब्ध करुन देण्याचे निर्देश या शासन निर्णयाव्दारे देण्यात आले आहेत. तसेच सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षामध्ये शाळांची शुल्क वाढ न करण्याचे निर्देशही साथरोग अधिनियमासह विविध अधिनियमांचा संदर्भ देवून देण्यात आले आहेत. शैक्षणिक क्षेत्रासंदर्भात झालेल्या या महत्वपुर्ण शासन निर्णयामुळे लॉकडाऊन काळात  रोजगार ठप्प पडल्यामुळे शाळांच्या फी चा भरणा न करु शकणार्‍या सर्व पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. हा शासन निर्णय महाराष्ट्रातील सर्व बोर्डाच्या, सर्व माध्यमांच्या व पूर्वप्राथमिक ते इयत्ता १२ वी पर्यतच्या विद्यार्थ्यांसाठी लागु आहे.
 जागतीक आरोग्य संघटनेने (डब्ल्युएचओ) कोरोना विषाणू (कोविड-१९) या आजारास जागतीक महामारी म्हणून घोषीत केले आहे. या आजाराच्या संसर्गाचा प्रतिबंध व नियंत्रण करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिसुचनेनुसार राज्यात साथरोग अधिनियम १८९७ व आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ ची अंमलबजावणी राज्यात सुरु आहे. सध्या राज्यात लॉकडाऊन सुरु आहे. अशी परिस्थिती असतांना काही संस्था, शाळा विद्यार्थ्यांना व पालकांना फीस भरण्याची सक्ती करत असल्याबाबत तक्रारी शासनाकडे प्राप्त झाल्यामुळे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या दि. ३० मार्च २०२० च्या परिपत्रकानुसार सर्व व्यवस्थापनाच्या शाळांना विद्यार्थी आणि पालकांकडून शाळेची चालु वर्षाची व आगामी वर्षाची फी जमा करण्याबाबत सक्ती करु नये. लॉकडाऊन कालावधी संपल्यानंतर फीस जमा करण्याबाबत सुचना देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (शुल्क विनियमन) अधिनियम २०११ मधील कलम (२१) अन्वये प्राप्त अधिकारान्वये तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा, कलम (२३) (१) व (२) अन्वये शासनाने प्राप्त अधिकारानुसार निर्गमित केलेल्या शासन निर्णय विस्तृतपणे आदेश दिले आहेत.
 या आदेशानुसार, पालकांच्या सोईच्या दृष्टीने शैक्षणिक वर्ष २०१९-२० व २०२०-२१ मधील देय / शिल्लक फीस वार्षिक एकदाच न घेता मासिक, त्रैमासिक जमा करण्याचा पर्याय शाळा व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांना द्यावा. शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१ साठी फी मध्ये कोणतीही वाढ करु नयें. शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१ साठी जर काही शैक्षणिक सुविधांचा वापर करावा लागला नाही व त्याबाबतचा खर्च कमी होणार असल्यास पालकांच्या कार्यकारी समितीमध्ये ठराव करुन त्याप्रमाणे योग्य प्रमाणात फी कमी करावी. लॉकडाऊन कालावधीत गैरसोई टाळण्यासाठी पालकांना ऑनलाईन फी भरण्याचा पर्याय द्यावा असे निर्देश शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अवर सचिव वंदना कृष्णा यांच्या डिजीटल स्वाक्षरीने निर्गमित झालेल्या शासन निर्णयाव्दारे महाराष्ट्रातील सर्व बोर्डाच्या, सर्व माध्यमांच्या व पूर्वप्राथमिक ते इयत्ता १२ वी पर्यतच्या शाळा व्यवस्थापनाला देण्यात आले आहेत. या शासन निर्णयाचा संगणक संकेतांक क्रमांक २०२००५०८१२०१५०७४२१ आहे. लॉकडाऊन काालवधीत झालेल्या या शासन निर्णयामुळे शैक्षणिक क्षेत्रातील विद्यार्थी, पालक आणि संबंधीत घटकांना मोठा दिलासा मिळाला असून शाळांच्या मनमानीला चाप लागला आहे.