Ticker

6/recent/ticker-posts

‘त्या’ प्रकरणी संबंधीत पोलीस अधिकार्‍यावर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हे दाखल करा : भिमसंग्राम सामाजीक संघटनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन


‘त्या’ प्रकरणी संबंधीत पोलीस अधिकार्‍यावर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हे दाखल करा
भिमसंग्राम सामाजीक संघटनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
वाशीम - जिल्हयातील कारंजा येथील एका प्रतिथयश वृत्तपत्राचे तालुका प्रतिनिधी तथा शेतकर्‍यावर विनाकारण केलेल्या अमानुष मारहाण प्रकरणी संबंधीत पोलीस अधिकार्‍यांना सेवेतून बडतर्फ करुन त्यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्याची मागणी भिमसंग्राम सामाजीक संघटनेने केली आहे. 24 एप्रिल रोजी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. माधव हिवाळे यांनी ई-मेल मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविले आहे.
    निवेदनात नमूद केले आहे की, कोरोना महामारी नष्ट होण्यासाठी भारतात सर्वत्र लॉकडाऊन सुरु आहे. या लॉकडाऊनमध्ये महाराष्ट्राच्या वाशीम जिल्हयातील कारंजा येथे कार्यरत दैनिक पुण्यनगरीचे तालुका प्रतिनिधी व शेतकरी सुधीर देशपांडे हे दुचाकीने जात असतांना कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशनचे उपनिरिक्षक उपनिरिक्षक वाघमोडे, शिपाई नितीन ठाकरे व संतोष इंगळे यांनी त्यांना विनाकारण शिवीगाळ व अमानुष मारहाण केली. सोबतच देशपांडे यांच्यासोबत असलेल्या त्यांच्या अल्पवयीन पुतण्याला सुध्दा मारहाण केली. ही बाब निश्‍चितच लोकशाहीचा चवथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारांसाठी खेदजनक आहे. तसेच देशात महाराष्ट्राची प्रतिमा कमी करणारी आहे. वास्तविक देशपांडे ज्या हद्दीत होते ती हद्द शहर पोलीसांची असतांना ग्रामीणच्या पोलीसांनी अधिकार नसतांना त्यांना मारहाण केली.  या घटनेनंतर येथील पत्रकारांच्या एकजुटीमुळे संबंधीत उपनिरिक्षक वाघमारे यांची बदली करण्यात आली असून याबाबीची पालकमंत्री शंभुराज देसाई यांनीही दखल घेतली आहे. या लोकशाहीप्रधान देशात आताच्या लॉकडाऊन काळात शासनाच्या सुचना नागरीकांपर्यत पोहचविण्याचे कार्य आपला जीव धोक्यात घालून करणार्‍या पत्रकारंाना पोलीसांकडून मारहाण करणे योग्य नाही. तसेच आपण स्वत: पत्रकार व एका वृत्तपत्राचे संपादक म्हणून अनुभवी आहात. तरी या गंभीर बाबीची आपण दखल घेवून संबंधीत पोलीसांवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हे दाखल करुन त्यांना सेवेतून बडतर्फ करावे अशी मागणी पाठविलेल्या निवेदनाव्दारे करण्यात आली आहे. निवेदनाच्या प्रती राज्याचे गृहमंत्री, माहिती व प्रसारण मंत्री आणि पोलीस महासंचालक यांना पाठविण्यात आल्या आहेत.