Ticker

6/recent/ticker-posts

नागरिकांनी घराबाहेर पडू नये, घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य करावे

नागरिकांनी घराबाहेर पडू नये, घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य करावे
प्रशासनाने सतर्क रहावे-नवाब मलिक
परभणी दि. २२ मार्च - परभणी जिल्ह्यात कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. वैद्यकीय अधिकार्‍यांनी दिलेल्या सुचनांचे पालन करावे. सार्वजनिक वितरण व्यवस्था विस्कळीत होवू नये. दुध,भाजीपाला,औषधे नागरिकांना घरपोच देण्याची व्यवस्था करावी. यासाठी पथके तयार करावी. जेणेकरून गर्दी होणार नाही. याची जिल्हा प्रशासनाने काटेकोर काळजी घ्यावी अशा सूचना अल्पसंख्याक मंत्री आणि परभणीचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी जिल्हा प्रशासनाला आज दिल्या.
सावली विश्रामगृह येथे आज अल्पसंख्यांक मंत्री तथा परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन अधिकार्‍यांची आढावा बैठक घेतली.
यावेळी जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर, मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी.पी., जिल्हा पोलीस अधिक्षक कृष्णकांत उपाध्याय, महानगरपालिका आयुक्त रमेश पवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शंकरराव देशमुख, महानगरपालिका आरोग्य विभाग प्रमुख डॉ. कल्पना सावंत, निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, उपजिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, तहसिलदार विद्याचरण कडवकर उपस्थित होते.
जिल्ह्यातील एकूण परिस्थितीची माहिती नवाब मलिक यांनी संबंधितांकडून घेतली. यावेळी जिल्हा सामान्य रूग्णालयात भेट देवून पाहणी केली. रूग्णांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. औषधांच्या साठ्याबाबत माहिती घेवून औषधे कमी पडू देणार नाही असे सांगतानाच शिवभोजन थाळीची संख्या वाढवण्याबाबतही संबंधितांना सुचना केल्या.शहरातील तसेच जिल्ह्यातील नागरिकांनी सर्वच बाबींची नोंद घ्यावी. तसेच स्वतःची व आपल्या कुटूंबाची काळजी घ्यावी असे आवाहनही पालकमंत्री नवाब मलिक यांनी यावेळी केले.